Saturday, July 25, 2009

जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा



आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू मूलतत्ववादी संघटनांचा टोकाचा अभिमान आणि इतरांबद्दलचा आंधळा तिरस्कार/ द्वेष असो...



आपली हजारो वर्षांची परंपरा कशी श्रेष्ठ आहे, सगळे आपल्या पुराणात आधीच कसे लिहून ठेवले आहे आणि सध्या आपण पाश्चात्य संस्क्रुतीचे गुलाम कसे झालो आहोत हे लोकांच्या गळी उतरवण्याचाच सगळा खटाटोप असतो...



तेवढे पुरेसे नाही म्हणून उगाच कशाचा कशाशीही संबंध जोडून नवे ’मार्केट’ तयार करायचे... काही वर्षांपूर्वीपर्यंत अजिबात ऐकीवात नसलेले ’वास्तुशास्त्र’ अचानक ’फार पुरातन’ शास्त्र बनून प्रचलीत होते...त्याला शास्त्रीय आधार काय, आणि ह्या पूर्वी त्याचा विचार का होत नव्हता वगैरे काही नाही... पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या कशा अचानक उगवतात तसे अनेक ’स्व-घोषीत’ वास्तुशास्त्र ’उगवतात’...तीच गोष्ट तेजस्वी आणि परिणामकारक असे ’राशींचे खडे’ किंवा ते अमुक यंत्र तमुक यंत्र विकणारे ज्योतीषी.



ह्या सगळ्यात काही प्रामाणीक आणि चांगले प्रयत्नही होत असतात, नाही असे नाही...पण कधी ते लोकांपर्यंत पोचत नाहीत किंवा खूपप्रमाणात पोचतात - इतके की त्याचे पूर्ण व्यावसायीकरण होते आणि मग त्याच्या खऱ्या उद्देशापासून वेगळ्याच गोष्टींना महत्व यायला लागते.



रामदेव बाबांचे योगाभ्यास आणि प्राणायाम यावरचे प्रयत्न आधी (आणि अजुनही काही प्रमाणात) मला चांगले वाटले होते...पण अलीकडे त्यांचा कल उलटसुलट दावे करणे (उदा: दात हे पडल्यानंतर आयुर्वेदाच्या मदतीने परत ’उगवू’ शकतात!) किंवा राजकीय व्यासपीठ, राजकीय भांडणे ह्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे उभे राहाणे ई. त्या व्यतिरिक्त इतर वाद (योगाभ्यासाचे खासगीकरण आणि व्यावसायीकरण करणे...हाडे/ मांस यांच्या औषधात वापर करणे असे आरोप) ही त्यांनी ओढवून घेतले...पण अजूनही काही प्रमाणात मला त्यांच्या कामाबद्दल आदर आणि उत्सुकता टिकून आहे.



पुण्यातील सकाळ व्रुत्तपत्रसमूह हादेखील पूर्वी खूप प्रतीष्ठीत समूह होता...पण आता तसे म्हणू शकतो का असा प्रश्न पडू शकतो...तीच गोष्ट बालाजी तांबे आणि त्यांच्या आयुर्वेदाच्या प्रयोगाची...त्यांचे (सकाळच्या पुरवणीत येणारे) काही लेख अतिशय चांगले होते, तर बाकीचे प्रचारकी थाटाचे होते.



पण काल सकाळ आणि बालाजी तांबे यांनी संयुक्तपणे जो कार्यक्रम पुण्यात सादर केला त्याच व्रुत्तांत वाचून हसावे का रडावे ते कळेना.. कार्यक्रम होता ’जीवनसंगीत’ ह्या विषयावर...त्यावर आजच्या सकाळ मध्ये आलेल्या बातमीतील हे काही उतारे:




बालाजी तांबे यांनी उलगडले 'जीवनसंगीत



"...ओ सजना बरखा बहार आयी' हे "परख' चित्रपटातील गीत रानडे यांनी गायले. त्यावर भाष्य करताना डॉ. श्री. तांबे म्हणाले, ""या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्‍वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.''




आता हे वाचून मी हसून गडाबडा लोळलो...ह्या गाण्यात ’परमेश्वराच्या मीलनाची उत्कट इच्छा आहे’ हे तांब्यांना कुठुन कळले काय माहिती...साध्या सोप्या प्रेमगीताचा संबंध ओढून-ताणून परमेश्वराशी कशाला? पण हेच आपल्या (वर सांगीतलेल्या) लोकांना कळत नाही...काही तरी करून हिंदू धर्म/ संस्क्रुती/ परंपरा/ ईश्वर ई. शी सगळ्याचा संबंध जोडायचा...आणि त्यापुढील कळस म्हणजे 'मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.' ...LOL...अशक्य आणि तुडंब हसलो मी...माझ्या डोळ्यापुढे ’हेरा फेरी’ मधला संडासात बसुन ’ओ...नी..ले...गगन के त..ले’ म्हणणारा अक्षयकुमार आला! आणि तशीच आता तांब्यांचे अभ्यासपूर्ण विचार ऐकून लोकं सकाळी घरोघरी ’ओ...सजना...’ गात आहेत असे चित्र उभं राहीलं...




------------------------------------



डॉ. तांबे म्हणाले, ""कार्य, कार्यशक्ती ही शरीरातील सूर्यशक्तीवर आणि पचनाग्नीवर परिणाम करते. ठेका आणि स्वररचना आपल्याला कार्यप्रवृत्त करतो.'' त्याचे प्रत्यंतर रानडे यांनी गायिलेल्या "ऐरणीच्या देवा तुला' या गीतातून आले.



शरीराच्या नाड्या आणि सांधे मोकळे करण्याचा अनुभव "हवा में उडता जाये' या गाण्याच्या श्रवणाने येतो.



तसेच, हृदय हे केवळ रक्ताभिसरणासाठी नाही तर त्याचा उपयोग प्रेमासाठी करावा, या डॉ. तांबे यांच्या वक्तव्याची प्रचिती "निगाहे मिलाने को जी चाहता है' हे गाणे ऐकताना आली. ते म्हणाले, ""दुसऱ्याच्या मनातील ओळखता येते तेव्हा सारासार विवेक करता येतो.



शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी उपयोगी असलेले "दशरथा घे हे पायसदान', रक्तदाब, मधुमेही रुग्णांना शांतरसाची अनुभूती देणाऱ्या "नैनों में बदरा छाये', स्मृतिवर्धन आणि मेंदूचे विकार यावर उपयुक्त असलेले "सिलसिला' चित्रपटातील "जो तुम तोडो पिया' हे मीराबाईचे भजन, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेले "वैष्णव जन तो' या भजनावर बेतलेले "किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार' हे गीत ऐकवण्यात आले.

------------------------------------




ऐकावे ते नवलच!



ह्यापूर्वी मिथुनचा अजरामर असा ’गुंडा’ हा चित्रपट पहाताना मला असा निखळ आनंद झाला होता... (गुंडा ह चित्रपत ज्यांनी पाहिला नाही त्यांनी तो आवर्जून पहावा... गूगल व्हीडिओ वर उपलब्ध आहे)



पण गुंडाची गोष्ट वेगळी होती...त्याचा उद्देशच तो होता...पण तांबे आणि सकाळ ह्या नावांशी असला अचरटपणा शोभून दिसत नाही...





s="Apple-style-span" style="font-size:medium;">त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले मराठीतील सध्याचे आघाडीचे गायक/ वादक यांना मी समजू शकतो...त्यांचा संबंध फक्त गाण्याशी...त्या गाण्याचा तांबे मलविसर्जनाशी जोडतात की, अध्यात्माशी की रक्ताभिसरणाशी की एकूणच जीवनपद्धतीशी, त्या कलावंतांना काय घेणे त्याच्याशी...




पण हे असले कार्यक्रम सकाळ आणि तांबे दोघांबद्दलही शंका निर्माण करणारे आहेत...निदान माझ्यासाठीतरी. (सकाळ तर हल्ली असल्या बाबतीत फारच मोकाट सुटला आहे)

No comments:

Post a Comment