Showing posts with label वाचन आणि विचार. Show all posts
Showing posts with label वाचन आणि विचार. Show all posts

Saturday, July 31, 2010

आरसा:



आरसा:
ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र काढली होती. जनरुढीच्या विरुद्ध जाऊन ती दोघे एकत्र राहात होती. लग्नाशिवाय. पण नाते लग्नाचे असो की बिनलग्नाचे, तो संसारच होता. संसाराचे सारे बरेवाईट संदर्भ, जबाबदाऱ्या, अडचणी तिथेही होत्याच. तीच गीता अवचित घर सोडून गेल्यावर श्रीनिवासचे घर रिते होणे स्वाभाविकच होते. घर रिते झाले होते, पण मन रिते झाले होते का? श्रीनिवासला ते अजून नीटसे उमगले नव्हते. मन रिते व्हायला आधी ते भरावे लागते. गीताने त्याचे मन तसे व्यापून टाकले होते का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीनिवासही देऊ शकत नव्हता. गीता त्याची इतक्या वर्षांची सहचारिणी होती; ती गेल्यावर तिच्याविषयी कोणताही अनुदार विचार मनात आणणे क्रुतघ्नपणाचे होईल असे त्याला वाटत होते. आणि तरीही तसेच विचार त्यच्या मनात येत होते. याच सुमाराला ते पत्र श्रीनिवासला आले होते आणि त्या पत्राने त्याचे मनःस्वास्थ्य नाहीसे करून टाकले होते.

एव्हाना श्रीनिवासला ते पत्र तोंडपाठ होऊन गेले होते. पत्रातला मजकूर मोजका आणि मुद्देसूद होता. पत्रातल्या ओळी श्रीनिवासला लखलखून आठवत होत्या ’...माझे पत्र तुम्हाला ढोंगीपणाचे वाटेल. असभ्यपणाचे वाटेल. तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटायला यावेवे फार वाटत आहे. तुमहा माझा परिचय कधीच झाला नाही. तसा कधी योगही आला नाही. मी आणि गीता विभक्त झाल्यावर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात. माझा तुमच्यावर मुळीच राग नाही. उलट गीताच्या जीवनाचे तारू कुठल्या कुठे भडकले असते, तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरेच वाटत होते. हे मी मनापासून लिहीत आहे. आज माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही. मी माझ्या साध्या सरळ संसारात सुखी आहे...तुम्हाला भेटावेसे मात्र फार फार वाटते...मी तुमच्या भेटीला येऊ का? तुम्ही नकार दिला तरीही मला नवल वाटणार नाही. तुमचा होकार कळला, तर मात्र फार समाधान वाटेल येवढेच सांगतो...अनुकूल उत्तराची वाट बघत आहे. आपला, वामन वालावरकर.’

पत्र आले आणि श्रीनिवास चक्राऊन गेला. वामन वालावरकर. ते नावही आता त्याच्या स्मरणातून पुसून गेले होते. गीताने कधी तरी आपल्या या पहिल्या पतीचे नाव त्याला सांगितलेले असणारच. पण तो ते खरेच विसरून गेला होता. आता ते नाव पत्रात वाचताना त्याला विचित्र वाटले. किती गद्य, व्यवहारी नाव वाटत होते ते. एखाद्या कापडाच्या, नाहीतर किराणा मालाच्या दुकानदाराचे नाव असावे तसे ते नाव होते.  गीता आपल्या ह्या पतीबद्दल क्वचितच काही बोले. कसा असेल हा माणूस? त्याचे रंगरुप, त्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल? आज त्याची मनःस्थिती काय असेल? गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुखीः झाला असेल का? गीताबद्दलच्या त्याच्या भावना तरी काय होत्या?

एकाएकी या वामन वालावरकरला भेटण्याची विलक्षण उत्सुकता श्रीनिवासला वाटू लागली? तसे अपराधी वाटन्यासारखे श्रेनिवासने कुठे काय केले होते? गीता आपल्या वैवाहीक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवले असते, तर त्याला अपराध्यागत वाटण्याचा संभव होता. पण तसे काहीच त्याने केले नव्हते. गीता आणि तो एकत्र आली तेव्हा, या पहिल्या नात्याचे सारे बंध तिच्या लेखी तुटूनच गेले होते. त्या धगधगत्या अंगाराची नुसती राखसुद्धा तिच्या मनात उरली नव्हती. मग आता या वामन वालावरकरला भेटायला काय हरकत होती? वालावरकराने जे लिहीले ते मनापासून लिहीले होते. अगदी प्रामाणिकपणे सौजन्यपूर्ण रीतीने तो श्रीनिवासला भेटू इच्छित होता. त्याला कदाचित श्रीनिवासचे सांत्वन करावयाचे असेल, कदाचित गीताबद्दल बोलण्याची त्याला अनावर इच्छा झाली असेल. कदाचित...कदाचित...

श्रीनिवासला पुढे विचारच करता येईना. एकदा त्याला वाटले, या अनोळखी परक्या माणसाला सरळ नकार द्यावा. गीता गेली. सारे संपले. आता तिच्या पहिल्या पतीला इतक्या वर्षांनंतर भेटण्यात अर्थ तरी काय होता? आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होते? तरीही वामन वालावरकरच्या पत्रातून ओसंडणारी मनाची सरलता, रुजुता त्याला कुठे तरी आतून खरेपणाने जाणवत होती. एकाएकी त्याने आपल्या मनाशी निर्णय घेऊन टाकला आणि आपली चलबिचल, संशय वाढण्याच्या आतच त्याने वालावरकरला आपल्या भेटीला यावयाची संमती दिली. संमतीचे पत्र धाडले आणि श्रीनिवास एकदम निश्चिंत झाला. त्याची चलबिचल संपली आणि वालावरकराच्या भेटीची तो शांत मनाने वाट बघु लागला.

भेटीचा दिवस ठरला. श्रीनिवास एका बड्या, श्रीमंती थाटाच्या फर्ममध्ये भारी पगारावर नोकरी करीत होता. भेटीचा दिवस ठरला, तेव्हा त्याने त्या दिवसापुरती रजा घेतली. नोकरालाअ आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या. वालावरकरला जेवायला बोलवावे असेही त्याला वाटले. पण नाही म्हटले तरी, वालावरकर हा सांत्वनाच्या भूमिकेवरून भेटायला येणार होता. अशा वेळी जेवायची सूचना त्याला करणे फारच वाईट दिसले असते. श्रीनिवासने कॊफी, बिस्किटे आणि फळे एवढाच बेत ठरवला. वालावरकराच्या भेटीच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला होता. खरे म्हणजे श्रीनिवास बुद्धीमान होता. चतुर होता. व्यवसायाच्या निमित्ताने तो देशभर हिंडला होता. एतकेच नाही तर, परदेशातही एकदा-दोनदा जाऊन आला होता. वालावरकरचा व्यवसाय काय होता याची त्याला कल्पना नव्हती. पण श्रीनिवासच्या तुलनेने तो खूपच सामान्य परिस्थितीत दिवस कंठीत असला पाहीजे याबद्दल श्रीनिवासला शंका नव्हती. त्याच्या भेटीच्या कल्पनेने गोंधळण्याचे, अस्वस्थ होण्याचे श्रीनिवासला कारण नव्हती. तरीही या भेटीच्या बाबतीत त्याला विचित्र वाटत होते एवढे मात्र खरे. व्यवसायाच्या निमित्ताने कितीतरी परक्या, अनोळखी माणसांना भेटण्याचा श्रीनिवासवर अनेकदा प्रसंग येई. पण वालावरकरची भेट ही तशा प्रकारच्या भेटींत बसणारी नव्हती. तो अनोळखी होता. तरीही ओळखीचा होता. म्हटले तर त्याच्याशी कसलेही नाते नव्हते. आणि म्हटले तर एका विलक्षण, अनाकलनीय नात्याने ते दोघेजण जोडलेले होते. जग सोडून गेलेल्या गीतापासून या नात्याचा उगम  होता. आणि त्या एका स्त्रीच्या नात्यानं परस्परांशी निगडीत झालेले हे दोन पुरूष तिच्या म्रुत्युनंतर आता अचानक एकमेकांना भेटणार होते.

भेटीचा दिवस ठरलेला होताच. त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. श्रीनिवासने गड्याला बाहेर पाठवून दिले होते. या भेटीच्या वेळी तिसरे कुणीही जवळ असू नये असे त्याला - का कोण जाणे - मनातून वाटत होते. बेल वाजताच त्याने जऊन स्वतः दार उघडले. दाराबाहेर एक मध्यमवयीन, प्रौढतेकडे झुकणारा, चेहेऱ्यावर अवघडलेपण धारण केलेला पुरूष होता. श्रीनिवासने त्याला पाहून ओळखीचे हास्य केले आणि दार पुरते उघडीत, स्वतः बाजूला होऊन तो त्याला म्हणाला,
’या, आत या ना.’
वालावरकर आत आला. तरिही संकोचाने तो काही वेळ उभाच राहिला. अस्वस्थ नजरेनं श्रीनिवास सुसज्ज, सुंदर दिवाणखान्याकडे पाहू लागला. अशा ठिकाणी जाण्याचा त्याला फार क्वचित प्रसंग येत असावा, हे त्याच्या एकूण हालचालींवरून, आविर्भावांवरून सहजच ध्यानी येत होते. श्रीनिवासचे मन करुणतेने, सहानभुतीने भरुन गेले. त्याने त्याला हाताशी धरून कोचावर आणून बसवले आणि सौम्य हसून तो त्याला म्हणाला,
’बसा असे आरामशीर. घर ंइलायला त्रास नाही ना पडला फारसा?’
’छे!’ वालावरकरही जरासा हसला ’तुम्ही पत्त व्यवस्थित कळवला होता. शिवाय फोनवरून आधी बोलणही झालं होतं. त्यामुळे तशी काही अडचण जाणवली नाही.’ तो म्हणाला.
’मग ठीक आहे.’ श्रीनिवास बोलला.

पुनः काही वेळ दिवाणखान्यात विचित्र शांतता पसरली. त्या शांततेचे दडपण त्या दोघांही पुरुषांच्या मनावर आल्या सारखे झाले. पण त्या निःशब्द वातावरणात दोघेही एकमेकांना प्रथमच नीट न्याआळून बघत होते. स्वतःशी दुसऱ्याचा वेध घेत होते. त्याच्याविषयी मनातल्या मनात अंदाज बांधत होते.
श्रीनिवासने वालावलकरह्च्या ध्यानी येणार नाही अशा पद्धतीने, पण सराईतपणे त्याच्याकडे बघून घेतले. दहा माणसांत सहज विसरायला होईल इतका साधा, सामान्य , व्यक्तीत्वहीन चेहरा. डोक्याला पडू लागलेले टक्कल आणि कानशीलांवरून मागे हटत चाललेले करडे केस. थकलेले श्रांत डोळे. चेहऱ्यावर ओढग्रस्त जीवनाने ठळक ओढलेल्या रेषा. वालावरकरच्या साऱ्या मुद्रेत आकर्षक होते ते त्याचे हसू. त्या हसण्यात एक निर्मळ स्वाभाविकता होती. दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल जवळीक, विश्वास निर्माण करण्याची शक्ती होती.

एकीकडे श्रीनिवास वालावलकरचे असे निरीक्षण करीत असता, वालावरकरही श्रीनिवासला जाणवणार नाही अशा बेताने त्याच्या मुद्रेचा, व्यक्तित्वाचा वेध घेत होताच. श्रीनिवासचे व्यक्तीमत्व आक्रमक, प्रभावी होते. चेहेरा देखणा नसला तरी, प्रथमदर्शनी दुसऱ्यावर ठसा उमटवणारा होता. हालचालीत यशस्वी धंदेवाल्या माणसाचा ठाम आत्मविश्वास होता. आणि या साऱ्यांतून पुनः एक हळवे, संवेदनशील असे मन डोकावत होते. वालावरकरला वाटले, गीतासारख्या मनस्वी स्त्रीला आपण पुरे पडलो नसतो. तिने श्रीनिवासला आपला जीवनसहचर बनवले हेच योग्य आहे. साऱ्या घटनेत त्याला एक न्याय वाटला. सुसंगती जाणवली. गीताबद्दल आता त्याच्या मनात काहीच अढी उरली नव्हती. श्रीनिवासबद्दल मनाच्या तळाशी चुकुन कुठे काही कडवट भाव रेंगाळत असेल तर, तोही श्रीनिवासला प्रत्यक्ष बघताना पार ओसरुन गेला. थोडक्यात सांगायचे तर, श्रीनिवासविषयी त्याचे फारच अनुकूल मत झाले.
दिवाणखान्यातली शांतता आता असह्य होऊ लागली दोघांनाही एकमेकांशी बोलावेसे वाटले. पण सुरुवात कुणी करायची, कशी करायची हा प्रश्नच होता. शेवटी वालावरकरच म्हणाला,
’गीताला काय झालं होतं?’ प्रश्न विचारताच आपण फार औपचारीक प्रारंभ केला आहे असे त्याला जाणवले. पण यापेक्षा वेगळे काय बोलावे, कसे बोलावे ते त्यालाही कळेना.
’तसं नीट काही कळलंच नाही अखेरपर्यंत.’ श्रीनिवास सांगू लागला, ’गेली २ वर्षं तिच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी चालूच होत्या. मग तिला अन्नच जाईनासं झाल, वजन उतरलं. खंगत गेली ती आणि शेवटी पंधरावीस दिवसांच्या तापाचं नुसतं निमित्त झालं...गेली. काहीशी अचानकच गेली म्हटलं तरी चालेल.’
श्रीनिवासलाही बोलताना विचित्र वाटत होते. वीस वर्षे आपल्याशी संसार केलेल्या गीताबद्दल बोलताना अगदी त्रयस्थ, अपरिचित व्यक्तीबद्दल बोलावे तशा कोरडेपणाने, वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोनातून आपण बोलत आहोत असे त्याला वाटले. पण जो जिव्हाळा पोटातूनच जाणवत नव्हता तो ओंठात कसा आणायचा हेच त्याला कळेना. कदचित वालावरकरसमोर याहून अधीक भावनावश होण्याचा त्याला खोल कुठे तरी संकोचही वाटत असावा. काही असो. एकूण बोलणे फारच वरवरच्या पातळीवर, उथळपणे चालले आहे असे त्याला वाटले. आणि तरीही याहून वेगळे कसे बोलावे हे त्याला उमगत नव्हते.
’मी गीताला बरीच वर्षं बघितलीच नाही.’ वालावरकर बोलू लागला.  ’एकदा आमच्या मुलींच्या शाळेत कसलंसं भाषण द्यायला आली होती ती. माझ्या मुलींपासून तिचं-माझं नातं मी अन माझ्या बायकोनंही लपवून ठेवलंय कटाक्षानं. पण मुलींना ती आवडली असावी. तिच्याबद्दल बरेच चांगलं बोलत होत्या त्या.’

वालावलकर क्षणभर थबकला. म्ग पुनः जरा अवघडून तो म्हणाला, ’तशी कुठल्या तरी एका महिला मंडळात, माझ्या पत्नीची अन तिचीही भेट झाली होती. त्यावेळी तिनं आवर्जून माझ्या घरची, माझी, मुलांची चौकशी केली होती. आम्ही दोघं भांडून वेगळे झालो, त्यावेळी दोघांचीही मने एकमेकांबद्दल कडवट होती. असावीत...आता इतकं जुनं काही आठवतदेखील नाही. पण निदान नंतर तरी गीताच्या मनात वैषम्य राहिलं नसावं माझ्याविषयी. माझ्या मनातही फारसा वाकुडपणा नसावा. आता तर ते सारच फार पुसून गेलय. म्हणूनच तुम्हाला भेटताना अगदी निःशंक, निर्मळ मनानं मी आलो आहे. खरंच सांगतो, तुम्ही भेटायचं कबूल केलंत हा मोठेपणा आहे तुमच्या मनाचा. दुसऱ्या एखाद्यानं सरळ ’नाही’ म्हटलं असत. खरं तर, आपला संबंध तरी काय? तुमचे मी खरेच आभार मानले पाहिजेत.’
श्रीनिवासला फार अवघडल्यागत झाले. तो चटकन म्हणाला, ’अहो भलतंच काय? आभाराची कसली भाषा बोलता? आभारच मानायचे झाले तर, मी ते तुमचे मानायला हवेत. तुम्ही आवर्जून माझ्या दुःखात मला भेटायला आलात. काही नातं मनानं मानलंत, गीताचे आठवण ठेवलीत, तुमचाच मोठेपणा आहे हा.’
’मोठेपणाची गोष्ट सोडा हो’ वालावरकर म्हणाला, ’खरं सांगू का? गीता गेली आणि वाटलं, आत्ताच तुम्हाला भेटायला हवं. एकमेकांची काही खरी ओळख पटली तर ती आत्ताच पटेल. ती ओळख पटवून घ्यायची उत्कट इच्छा झाली येवढं मात्र सांगतो. कारण ते अगदी खरं आहे.’

-संभाषण गती घेत होते. स्वतःच्याही नकळत, ते दोघे अनोळखी पुरुश एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. परस्परांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते. काही दुवे जुळत होते. श्रीनिवासला अचानक आठवण झाली. आल्यापासून या पाहुण्याला आपण चहापाणी विचारले नाही. तो म्हणाला,
’तुम्ही कॊफी घ्याल ना?’
बोलता बोलता त्याला शंका आली, या माणसाने आपल्याकडे काहीच घ्यायला नकार दिला तर? गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतेच. पण कदचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतःप्रेरणेने, काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावे-प्यावेसे वाटणार नाही. तसे झाले तर? आपल्याला राग येईल? वाईट वाटेल? समाधान वाटेल?
पण हे सारे विचार श्रीनिवासच्या मनात आले असतील तोच, वालावलकर हसून म्हणाला,
’खरं तर, आज मी कॊफी वगैरे घ्यायला नकार द्यायला हवा. पण ऒफीसातून सरळ इकडंच आलोय मी. कॊफीची फार गरज आहे बुवा. खायला देखील चालेल सोबत काहीतरी.’
श्रीनिवासच्या मनावरचे दडपण एकदम दूर झाले. वालावलकरच्या सरळ, मुग्धपणाने त्याचा ठावच घेतला. तो भरकन स्वैंपाकघरात गेला आणि कॊफी तयार करून घेऊन बाहेर घेऊन आला. बरोबर बिस्किटे होती, फळे होती. इतकेच नव्हे तर, घरातल्या डब्यांतून मिळालेले आणखी काही खाण्याचे पदार्थंही त्याने बशा भरून आणले होते. टीपॊयवर ते सारे पदार्थ ठेवीत तो मनःपूर्वक म्हणाला,
’या वालावलकरसाहेब, मलाही भूक लागली आहे. अगदी संकोच न करता घ्या बघू सारं काही’
वालावलकरने एक-दोन पदार्थ तोंडात टाकले आणि गरम कॊफीचा घोट घेऊन त्याने समाधानाचा, त्रुप्तीचा निःश्वास सोडला. मग अचानक त्याने श्रीनिवासकडे सरळ रोखून पाहिले आणि तो म्हणाला,
’एक विचित्र प्रश्न विचारु?’
श्रीनिवास दचकला. कॊफीचा कप दूर करून प्रश्नार्थक नजरेने तो वालावलकरकडे बघत राहिला.
’माफ करा, खासगी प्रश्न विचारतो आहे. पण गीता आणि तुम्ही सुखात होता का? विशेषतः गीता सुखी झाली का?’
श्रीनिवासला वालावरकरच्या प्रश्नाचा राग आला. पण रागावता रागावताच तो एकदम अंतर्मूख झाला. वालावलकरच्या प्रश्नात, आपणाला अपमानकारक असे काही नाही, हे कसे कोण जाणे-त्याच्या ध्यानात आले. त्याने भुवया आकुंचित केल्या. काहीसे आठवण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला,
’गीता सुखी होती की नाही सांगणं अवघड आहे. तशी ती समाधानी दिसायची. पण, खरं सांगू? तशी गीता मला फारशी कधी समजलीच नाही. थांग नाही लागला तिचा मला कधी.’
’एकूण, गीता कधी बदललीच नाही म्हणायची’ वालावलकर स्वतःशीच पुटपुटावे तसा बोलला.
’म्हणजे काय? ती बदलली नाही असं कोणत्या अर्थानं म्हणता तुम्ही?’ श्रीनिवासने कुतूहलाने विचारले.
’तुम्ही विचारताच आहात तर सांगतो सारं काही’ वालावलकर म्हणाला. त्याने भुवया आकुंचित केल्या. जुने काही आठवण्याचा तो प्रयत्न करीत असावा.

क्षणभराने कपाळावरुन हात चोळीत तो म्हणाला,
’कसं सांगू? सांगणं अवघड आहे मोठं. गीताचं नि माझं लग्न झालं ते घरच्या माणसांच्या संमतीनं. तेव्हा ती लहान होती. मीही पोरसवदा होतो. भातुकलीचा खेळ असावा, तसा संसार होता आमचा. आम्ही घर मांडलं. मला पैसे कमी मिळत. गीता नीटशी कधी उमलली नाही. फुलली नाही. ती अस्वस्थ दिसे. तिला सतत काही तरी निराळेच हवे असायचे. काय ते मला कळलं नाही. तिलाही कळलं नाही, ती शिकू लागली. बी.ए. झाली. आमचा पैसा वाढला. एक मूल झालं. गेलं. पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं. तसं भांडण नव्हतं, तंटा नव्हता, काही नव्हतं. मला वाट्तं, ती एकूण माझ्या घरालाच कंटाळली. एक दिवस सरळ माहेरी निघून गेली. मीही भांडणतंटा केला नाही. तिला मोकळीक हवी होती. ती मी तिला दिली. मी माझ्या वेगळ्या मार्गाला लागलो. संपलं!’
वालावरकर बोलायचा थांबला. किती निर्विकारपणे बोलत होता तो. पण त्यातून श्रीनिवासला गीताची एक नवी ओळख पटत गेली. कशी होती गीता? खरे म्हणजे, त्यालाही ते नीटसे उमगले नव्हते. गीताने पुढे शाळेत नोकरी धरली होती. कुठल्याशा एका लग्नसमारंभात त्याची व गीताची ओळख झाली. प्रथमदर्शनी ती त्याला आवडली. मग भेटी, फिरणे, चारदोन सिनेमे. त्याने तिला मागणी घातली. तिने आपला पूर्वव्रुत्तांत त्याला सांगितला होता. काहीच लपवून ठेवले नव्हते. गीताचे पूर्वी एक लग्न झाले होती यात श्रीनिवासला काही आक्षेपार्ह वाटले नाही. त्याने तिच्याशी लग्न केले. आपल्या व्यवसायात तो वर वर चढत गेला. घरात पैसा आला. अनेक सुखसोयी आल्या. संसार झाला. पण-संसार झाला इतकेच. यापेक्षा जास्त त्याला गीता खरोखरच उमगली नव्हती...

- दिवाणखान्यातल्या शांततेची आता कुठे त्याला जाणीव झाली. वालावरकरचे बोलून संपले होते. आता श्रीनिवासने काही बोलावे असे त्याला वाटत असणार. त्याच अपेक्षेने तो श्रीनिवासकडे बघत होता. पण काय बोलावे ते श्रीनिवासला उमगत नव्हते. तो हताशपणे किंचित हसला आणि वालावरकरला म्हणाला,
’तुमचा हेवा वाटतो मला. किती थोडक्यात तुम्ही तुमच्या संसाराचा आढावा घेतला. पण मला तसं काहीच सांगता येत नाही. येवढंच सांगतो की, मलाही गीता कधी कळली नाही. ती तशी हसे-खेळे. आनंदानं वागे. निदान आनंदात असल्यासारखी दिसे. पण आम्हा दोघांत अलिप्ततेचा एक पडदा कायम राहिला. गीताला मूल हवं होतं का? तेही मला कळलं नाही, तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही. ती त्रुप्तही नव्हती. तिनं जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही. तिनं माझ्याकडे कधी काही मागितलंही नाही. जीव भरून मला कधी काही दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं पण मन रितं झालं का? कळत नाही मला. कारण गीतानं माझं मन कधी भरूनही टाकलं नाही. या प्रकाराचा उलगडाच होत नाही मला. माफ करा. मी फार बोलतो आहे. कदाचित अप्रस्तुतही बोलत असेन. पण मला वाटतं, मी जे बोलतो आहे त्याचा अर्थं तुम्हीच जाणू शकाल.’
वालावरकर क्षणभर स्तब्ध राहीला. मग तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता स्वयंपूर्ण होती. स्वतःच ती संतुष्ट होती. तिला कधी कुणाची गरजच भासली नसावी. तिनं दोन लग्नं केली. दोन संसार थाटले. पण मला वाटतं, तिला त्याची आवशकताच नसेल. अशा स्त्रीया असतात का? कुणास ठाऊक! निदान गीता तशी होती. असावी.’
’तिला नेमकं काय हवं होतं, मला कधीच कळलं नाही.’ श्रीनिवास स्वतःशीच बोलावा तसे बोलला.
’मलाही समजलं नाही ते.’ वालावलकर म्हणाला. मग अचानक काहीसे आठवल्यासारखे करून तो बोलला,
’गीताचा एखादा फोटो आहे? मला....मला तिला बघावसं वाटत. तुमची हरकत नसेल तर-’
’हरकत कसली त्यात?’ श्रीनिवास चटकन उठून म्हणाला, ’थांबा. बेडरूममध्ये फोटो आहे तिचा. घेऊन येतो.’
तो आत जाऊन गीताचा फोटो घेऊन आला. वालावरकरने फोटो घेतला. तो त्याकडे बघू लागला. गीतात फारसा फरक पडला नव्हता. तेच आत्ममग्न डोळे. तेच घटट मिटलेले ओठ. चेहऱ्यावर तोच परका, दूरस्थ, स्वतःत रमलेला भाव. फोटोकडे टक लावून बघून वालावरकरने एक हलका निःश्वास सोडला. मग त्याने तो फोटो दूर ठेऊन दिला.

’तुम्हाला...तुम्हाला या फोटोची एखादी प्रत हवी आहे का?’ श्रीनिवास संकोचाने म्हणाल, ’हवी असेल तर देतो.’
’छेः मला काय करायचा आहे फोटो!’ वालावलकर चटकन म्हणाला. मग अचानक एक गूढ वाक्य तो बोलला. तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता हा एक आरसा होता. आरशाला स्वतःचं रंगरूप नसतं. भावना नसतात. गीता तशीच होती. त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं. एकदा तुमचं. पण आरशाला ना त्याचं सुख, ना दुखः. आज आरसा फुटलाय. पण त्याच्या फुटलेल्या कांचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली. आपण दोघे एकमेकांच्या जरा अधिक जवळ आलो...’

श्रीनिवास विस्मयाने थक्क झाला. हा सामान्य, व्यक्तीत्वहीन दिसणारा माणूस असे काही बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती. आरसा. तो गीताच्या व्यक्तीत्याच्या या नव्या अर्थाची स्वतःशी ओळख पटवून घेऊ लागला.
संध्याकाळ दाटत चालली होती. दिवाणखान्यात काळोख भरत होता. गीताचा फोटो अस्पष्ट होत होता. आणि ते दोन अनोळखी, परके पुरूष एकमेकांसमोर बसून आपणांमध्ये जडलेल्या या नव्या नात्याचा विचार करीत होते. अर्थ लावीत होते. फुटक्या आरशात उमटलेली एकमेकांची प्रतिबिंबे बघत होते.

(शांता शेळके लिखित ’अनुबंध’ ह्या कथासंग्रहातील ’आरसा’ ही कथा)

Tuesday, July 27, 2010

सुवर्णमुद्रा



सुवर्णमुद्रा:

नुकतंच मी पुणे मराठी ग्रंथालयामधून शांता शेळके यांचं ’सुवर्णमुद्रा’ नावचे पुस्तक आणलं. त्यात छोट्या-छोट्या कविता, विचार, उतारे यांचे संकलन आहे. त्यातलेच काही वेचक इथे देत आहे!
---------------------------------------------------------------------------------

इशारा:

तुम्ही जेव्हा उत्कट आनंदाच्या ऐन भरात असाल तेव्हा कुणालाही, काहीही वचन, आश्वासन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा अत्यंत संतापलेले असाल तेव्हा कुणाच्या कसल्याही पत्राचे उत्तर देऊ नका

- चिनी म्हण
---------------------------------------------------------------------------------

सुख:
कुणी तरी आपल्यावर उत्कटपणे प्रेम करणारे आहे या जाणीवेइतके सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते
व्हिक्टर ह्युगो
---------------------------------------------------------------------------------

एकरुपता:
लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ॥
तैसा समरस झालो । तुजमाजी हरपलो ॥
अग्निकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ॥
तुका म्हणे आता । तुझी माझी एक ज्योती ॥

~ संत तुकाराम
---------------------------------------------------------------------------------

जुनी पत्रे:
जुनी पत्रे वाचताना खूप गंमत वाटते. आनंदही होतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही की त्या पत्रांना उत्तरे लिहिण्याची जबाबदारी आपल्यावर नसते!
---------------------------------------------------------------------------------

स्त्री:
एक पर्शियन कवी म्हणतो: जागाच्या प्रारंभकाळी अल्लाने एक गुलाब, एक कमळ, एक कबूतर, एक सर्प, थोडासा मध, एक सफरचंद आणि मूठभर चिखल घेतला. या साऱ्यांचे जेव्हा त्याने मिश्रण केले तेव्हा त्यातून स्त्री निर्माण झाली!
---------------------------------------------------------------------------------

परपुरषाचे सुख:
परपुरषाचे सुख भोगे तरी ।
उतरोनि करी घ्यावे शीस ॥
संवसारा आगी आपुलेनि हाते ।
लावुनी मागुते पाहू नये ॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट ।
पतंग हा नीट दीपावरी ॥
---------------------------------------------------------------------------------

कळपाचे नियम:
कळपात राहून कळपाचे नियम मोडणाराला माणसे निष्ठूर शासन करतात. समाज त्याचे प्रत्यक्ष वाभाडे काढत नसेल पण तो त्याला समाजात वावरणे अशक्य करून सोडतो. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या माणसांची हलकेहलके पण अगदी पद्धतशीर रीतीने हकालपटटी केली जाते. तो माणूस फारच ताकदवान असेल तर इतर लोक त्याचे काही वाकडे करु शकत नाहीत. मग नाइलाजाने ते त्याला आपल्यात सामावून घेतात. वेळप्रसंगी त्याच्यापुढे लोचटपणा करतात. लाचारीही पत्करतात. पण या साऱ्यामागे एक स्वच्छ नकार, झिडकार दडलेला असतो. माणसाच्या या दुटप्पी वर्तनापेक्षा कळपाचे नियम न पाळणाऱ्या पशूंचा किंवा पक्ष्यांचा सजातियांनी केलेला क्रूर वध अधिक दयाळूपणाचा आहे अस वाटत नाही का?
---------------------------------------------------------------------------------

विनवणीः
दूर लाजुन पळतेस कशाला?
का म्हणतेस तू ’नका-नका’?
घडेल तेव्हा संग घडो पण
तूर्त एक घेऊ दे मुका !

- पारंपारिक लावणी
---------------------------------------------------------------------------------

अविद्या:
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले

- महात्मा ज्योतिबा फुले
---------------------------------------------------------------------------------

प्रीतिसंगम:
दोघेही एकमेकांवर रुसली होती. अन्तःप्रेरणेने त्यांनी एकमेकांकडे चोरुन कटाक्ष टाकले! त्यांच्या द्रुष्टीचे मीलन झाले तेव्हा दोघेही एकदम हसली!

- गाथासप्तशती
---------------------------------------------------------------------------------

कुणासाठी कोण:
कुणासाठी कोण देही जपतसे प्राण
कुणासाठी कोण जीव टाकते गहाण !
---------------------------------------------------------------------------------

उच्छादी वारा:
कसा उच्छादी हा वारा
केळ झोडपून गेला
किती झाकशील मांडी?
नाही मर्यादा ग ह्याला !

- पु. शि. रेगे
---------------------------------------------------------------------------------

आयुष्य:
हे आयुष्य म्हणजे हुंदके, स्फुंदणे, उसासे आणि हसणे या साऱ्यांचे मिळून एक विचित्र मिश्रण आहे. पण त्यात स्फुंदण्याचे प्रमाण जरा जास्त असते.
- ओ. हेन्र्री
---------------------------------------------------------------------------------

मला नाही:
तुला बाबा मला बाबा
तुला दादा मला दादा
तुला ताई मला ताई
तुला आई मला नाही
---------------------------------------------------------------------------------

एक क्षण:
एक क्षण असतो मुक्त बोलण्याचा
एक क्षण असतो मौन पाळण्याचा !
---------------------------------------------------------------------------------

घातक:
भलत्या वेळी सांगितलेले सत्य असत्याइतकेच घातक असते.
---------------------------------------------------------------------------------

जुने ठवणे मीपण आकळेना
जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ।
देहे बुद्धिचे कर्म खोटे टळेना
जुने ठेवणे मीपण आकळेना ॥
---------------------------------------------------------------------------------

काळ्या निळ्या ढगातः
काळ्या निळ्या ढगात कडाडते वीज
डोळ्यांतून कुठे तरी उडून जाते नीज
गहन रात्रीच्या पदरात स्वप्नांचा संभार
मनात जाग्या होतात आशा अपरंपार !
---------------------------------------------------------------------------------

संपर्क माध्यमेः
प्रेम, लहान मुले आणि आपण करत असलेले काम - माणसाच्या भोवतालच्या जगाशी उत्कट संपर्क साधणारी ही तीन संदर माध्यमे आहेत
- बर्ट्रान्ड रसेल
---------------------------------------------------------------------------------

मित्र ओळखाः
मित्र तयार करता येत नाहीत. ते जीवनात येतच असतात. पण आपण त्यांची ओळख पटवुन घ्यावी लागते. आणि एकाकी, स्नेहशून्य माणसांचे हेच मोठे दुखः असते. त्यांच्याभोवती माणसे वावरत असतात. पण एकाकी माणसांना त्यांच्यातला स्नेहभाव ओळखता येत नाही.
---------------------------------------------------------------------------------

टीकाखोरः
मला टीका करण्याची फार खोड आहे. माझी मते उकलून दाखवताना मी नेहेमी दुसऱ्यांच्या मनांतील वैगुण्ये दाखवीत असतो, आणि माझ्या लेखनात जर माझी ही खोड एकपट दिसत असली तर माझ्या बोलण्यानं ती दुप्पट दिसून येते. दोष काय आहेत हे पाहण्याची प्रव्रुत्ती माझ्यात अगदी प्रखर आहे, नसावी इतकी प्रखर आहे. भोवतालच्या लोकांच्या बोलण्यातील, विचारांतील चुका दाखवणे ही माझी जित्याची खोड आहे ती काही केल्या जात नाही. माझे मलाच त्याचे वाईट वाटते पण स्वभावाला औषध नाही !

- हर्बर्ट स्पेन्सर
---------------------------------------------------------------------------------

चुकलेच!
येवढे प्रदीर्घ आयुष्य माझ्या वाट्याला येणार आहे हे जर मला थोडे आधी कळले असते तर मी माझ्या प्रक्रुतीची जरा अधीक काळजी घेतली असती !
---------------------------------------------------------------------------------

प्राण की पैसा?
गुंडोपंत रानातून एकटेच प्रवास करत होते. वाटेत चोरट्यांनी त्यांना अकस्मात गाठले. ’चल, काय पैसे जवळ असतील ते काढ’ चोरट्यांचा नायक दरडावून त्यांना म्हणाला, ’नाही तर तुझा जीवच घेतो बघ. बोल. पैसा की प्राण?’ ’तर मग तुम्ही माझे प्राणच घ्या’ गुंडोपंत म्हणाले, ’मजजवळच्या पैशाला मात्र हात लावू नका. कारण तो मी आपल्या म्हातारपणासाठी जमवत आलो आहे !’
---------------------------------------------------------------------------------

एकटेपणाचे मह्त्व:
एकटे राहण्याची सवय करुन घ्या. एकटेपणाचे फार फायदे आहेत. ते गमावू नका. स्वतःचा सहवास स्वतः अनुभवणे, त्यात रमणे ही फार आनंददायक गोष्ट आहे. ती साध्य झाली तर तुम्हाला इतरांच्या संगतीशिवायही सुखासमाधानाने राहाता येईल. एकदा अनुभव तर घेऊन पाहा !
---------------------------------------------------------------------------------

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे तुझे, थोडे माझे । सारे आपुल्या दोघांचे
कुठे शुभ्र, कुठे अभ्र । रंग अनोखे नभाचे
काही प्राप्त, काही लुप्त । काही फक्त क्षितिजाचे
नाही खंती - जे जे हाती । ते ते आनंदघनाचे !
---------------------------------------------------------------------------------

काळ:
माणूस जगतो काही काळ
आणि जातो मरून
काळ आपला शांतपणे
बघत असतो दुरून !
---------------------------------------------------------------------------------

शिकण्यासारखे काही:
आम्ही दूध पितो
मांजरही दूध पिते...
पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो
मांजरही मरेस्तोवर जगते...
पण मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते !
आम्हाला तेही कळत नाही...
पण त्याचा आत्मा भटकत राहिल्याचे कोणी ऐकले नाही !
प्रुथ्वीवरचा सर्वांत हुषार प्राणी
माणूस असेलही...
पण त्यान्ही कधी तरी निवांतपणे
म्यॊंव करायला हरकत नाही !

- एक ग्रीटींग कार्ड (खास ’माऊ’ साठी!)
---------------------------------------------------------------------------------

नको:
नको शब्दांची आरास, नको सुरांचे कौतुक
तुझ्या माझ्या मनातले तुला मलाच ठाऊक !
---------------------------------------------------------------------------------

सागर पोहत बाहुबळाने:
सागर पोहत बाहुबळाने नाव तयासि मिळो न मिळो रे
स्वयेच तेजोनिधे जो भास्कर तदग्रुहि दीप जळो न जळो रे
जो करि कर्म अहेतु निरंतर देव तयासि वळो न वळो रे
झाली ओळख ज्यास स्वतःची वेद तयासि कळो न कळो रे

- श्री. रा. बोबडे
---------------------------------------------------------------------------------

Sunday, May 16, 2010

नवस…


लोकं देवाला नवस बोलतात - की अमुक झाले तर तुला तमुक अर्पण करीन, दान करीन, देईन...

मग देव त्यांच्या (सगळ्यांच्या नाही, काही पुण्यवान लोकांच्या) ईच्छा पूर्ण करतो. आणि लोकं देवाला बोललेला नवस फेडतात.
मी मला स्वतःलाच नवस बोलतो. उदा. कौस्तुभ...तु हे केलेस तर मी तुला घेईन, किंवा तु ते केले नाहीस तर मी तुला ते देइन. त्यामुळे तो पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच येते...

लोकं देवाला नवस बोलून निर्धास्त होतात...कारण उरलेलं काम देव करतो...

माझं तसं नाही...माझा नवस मलाच पूर्ण करावा लागतो, त्यासाठी लागणारे कष्ट, मेहेनत ही मलाच करावी लागते.

कधी-कधी माझ्या कष्टाचे फळ मला मिळते आणि मग मी खुश होऊन मला बोललेला नवस फेडतो...

पण बऱ्याचदा ते साध्य पूर्ण होत नाही...मग मी स्वतःवरच चिडतो (लोक देवावर चिडू शकत नाही...हा एक फरक!) आणि मग त्यावेळेस नवस फेडायचा प्रश्नच येत नाही...

मग मी revised नवस बोलतो...स्वतःलाच...आणि ते achieve करायचा प्रयत्न करतो...

असाच एक नवस म्हणजे - iPhone घेणे. मला iPhone 3GS घ्यायचाय...पण काही गोष्टी पूर्ण झाल्या तरच.

दुर्दैवानी त्या गोष्टी ठरवलेल्या time frame मध्ये पूर्ण झाल्या नाहीयेत. त्यामुळे मी आत्ता किंवा नजीकच्या काळात iPhone घेऊ शकत नाहीये...जोवर मी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करत नाही :(

तो पर्यंत मी हाच माझा कॆमेरा फोन असेल :)


~ कौस्तुभ

Saturday, April 24, 2010

साहित्य संमेलन – मला दिसले तसे…




¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...



¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो! (??) ही अजून एक गंमत). मी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी गेलो. आधीच्या २ दिवसांचे माहिती नाही पण समारोपाला अमिताभ बच्चन येणार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. मी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिथे पोचलो.



¶पुस्तक प्रदर्शनात जाता जाता वाटेत कवि-संमेलनाच्या ठिकाणी थोडावेळ थांबलो. तिथे श्रोत्यांपेक्षा स्टेजवर कविता साजरी करायला जमलेल्या कवींची गर्दी जास्त होती. निमंत्रितांचे मुख्य कविसंमेलन आधीच होऊन गेले होते. त्यामुळे हे म्हणजे नवीन आणि होतकरु कवींना संधी (किंवा ’उपेक्षितांना संधी’) देण्यासाठी आयोजित केलेले कवीसंमेलन होते. (एवीतेवी मांडव घातलेलाच आहे, त्याचे भाडे द्यावे लागणारच...मग त्यात चार टाळकी आपली (रड)गाणी गात बसले तर बसु दे की...’ - आयोजकांचा ’आतला’ आवाज!)


¶त्यामुळे एकुणच वातावरण मंगल कार्यालयात मुख्य कार्य झाल्यावर मोठ्ठ्या सजवलेल्या खुर्च्या, टेबलं (टेबल या इंग्रजी शब्दाचे हे मराठी अनेकवचन आहे), फुलांच्या माळा इ. भोवती लहान पोरं-टोरं खेळत बसतात ना तसला प्रकार होता. त्याला काहिही नियोजन नाही, समन्वय नाही. मी आत जायचा धोका पत्करला नाही. एकटा ’रसिक’ असा बुभुक्षित कवींच्या कळपाला एकटा सामोरा कसा जाणार? तसेही कवी संभाव्य ’गिऱ्हाईक’ ओळखून त्यांना बेसावधपणे गाठण्यात पटाईत असतात. (अपवाद वकीलांचा...त्यांच्याहून पटाईत कोणीच नसते!), त्यातून हे शिकाऊ (आणि बरेचसे टाकाऊ कवी)...


¶तिथून जवळच दुसऱ्या तंबूत ’परिसंवाद’ चालला होता. (परिसंवाद ह्या विषयावर सविस्तर पुढच्या भागात लिहीणारच आहे...) विषय होता: ’सातासमुद्रापलिकडील मराठी लेखन’. भाग घेणाऱ्या (इंपोर्टेड) साहित्यिकांत ३ अमेरिकेचे होते, एक कॆनडा, एक सौदी अरेबिया आणि एक सिंगापूर! सूत्रसंचालन मात्र पुण्यातल्याच सूत्रसंचालकाकडे होते...काही झाले तरी या ना प्रकारे सगळी ’सूत्रे’ आपल्याकडे ठेवायची हे पुण्यातल्या लोकांना बरोबर जमते. बाकीच्या देशातले मराठी तिथे का नव्हते कुणास ठाऊक? बहुदा लेखक ’सातासमुद्रापलिकडील...’ असा उल्लेख असल्यामुळे (सूत्रसंचालक धरून) सातच माणसे असावीत किंवा त्यांच्याकडे बरोब्बर सातच खुर्च्या असाव्यात. असो.  दुपारी २:३०-३ ची वेळ आणि तंबूतला उकाडा यामुळे आयात केलेल्या पाहुण्याचा मेक-अप उतरायला लागला होता...पण उत्साह मात्र भक्कम होता!


¶ह्या विषयात चर्चा किंवा परिसंवाद करण्यासारखे काय होते मला कळले नाही त्यामुळे ते मुळात एका उंच स्टेजवर चढून, खुर्च्यांमधे अवघडून का बसले आहेत, आणि अत्यंत निरर्थक बडबड का करत आहेत तेच मला कळले नाही. त्यामुळे मी तिथे न रेंगाळता ग्रंथप्रदर्शनाकडे वळलो.


¶ग्रंथप्रदर्शनात ’ग्रंथ’ सोडून इतर गोष्टींचाच भरणा जास्त होता. पुण्यात तसे सतत ग्रंथप्रदर्शन चालूच असते त्यामुळे वेगळे ग्रंथदालन कशासाठी ते कळेना? खूप जास्त स्टॊल आहेत हे वैशिष्ट्य आहे असे मानले तर एक तर सगळ्या स्टॊल मधली पुस्तके बरीचशी सारखीच होती (कारण ते वेगवेगळ्या प्रकाशकांचे स्टॊल नव्हते, तर वेगवेगळ्या वितरकांचे आणि विक्रेत्यांचे स्टॊल होते, बस्स), आणि दुसरे म्हणजे इतके स्टॊल एका जागी असणे हेही काही विशेष नाही. ’अप्पा बळवंत चौक, पुणे’ इथे असे कायम स्वरूपी ग्रंथदालन आहे.


¶सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ’ग्रंथ’ या विषयात लोकांना जास्त रस नव्हता. एकूणच वेगवेगळ्या स्टॊलवरची गर्दी पाहिली की लगेच माझे म्हणणे पटेल.


¶सगळ्यात जास्त गर्दी अर्थातच खाण्या-पिण्याच्या ठिकाणी होती. पुण्यात कुठही गल्लीबोळात गेलात तरी प्रत्येक खाण्याची जागा धूमधडाक्यात चालत असलेली दिसेल. मग साहित्य संमेलन तरी अपवाद का असावा? साहित्यसंमेलनाला सहकुटुंब आलेले लोक जत्रा, मेळा, सर्कस किंवा नाटक/चित्रपट सारख्या करमणूकीच्या ठिकाणी गेल्या सारखे ५-१० मि. पुस्तके चाळून यथेच्छ भेळ, पाणी-पूरी, सामोसा हादडत होते!


¶सी-डॆक या संस्थेच्या स्टॊलमध्ये त्यांनी ’मराठी’ आणि ’संस्क्रुत’ फॊंटच्या सीडीज ठेवल्या होत्या. तिथली गर्दी पाहून मी लगेच ओळखले की ते सीडीज फुकट वाटत होते! जाता जात एक जोडप्याचे बोलणे कानावर पडले. ’अगं, कशाला आता सीडी? आपल्याकडे कॊम्प्युटर तरी आहे का?’ ’नसला म्हणून काय झालं? मिळतीये सीडी तर घेऊन ठेऊ ना आत्ता...अगदीच काही नाही तर पुढच्या महिन्यात ’अबक’ चा वाढदिवस आहे त्याला देऊ या सीडी भेट...’ (म्हणजे स्टॊल वर फुकट मिळणाऱ्या सीडीज घेऊन पुढच्या महिन्यातल्या वाढदिवसाच्या भेटवस्तुची सोय करायची असे किती दूरदर्शी आणि धोरणी ’साहित्य रसिक’ जमले होते!)


¶त्याखालोखाल गर्दी ज्या ठिकाणी होती तिथे वर काहीच नाव नव्हते त्यामुळे तिथे नक्की काय आहे अशी उत्सुकता वाटून तिथे गेलो. तर तिथे दोन कलावंत रेखाचित्र आणि अर्कचित्र रेखाटत होते. प्रत्येक चित्रासाठी रु. १०० /-  केवळ १०-१५ मि. खरोखच सुंदर अर्कचित्र ते बनवून देत होते...त्यामुळे ते बघायला आणि आपले चित्र काढून घ्यायला बरीच गर्दी जमली होती.


¶सगळ्यात जास्त गर्दीचे जवळपास ३-४ स्टॊल असे ’बिगर-साहित्यिक’ असल्यामुळे एखादा गर्दी असलेला ’साहित्यविषयक’ स्टॊल शोधावा म्हणून मी पुढे गेलो. शेवटी बऱ्यापैकी गर्दी असलेले असे ३-४ स्टॊल मला दिसले. ते अनुक्रमे भविष्य/हस्तरेषा वास्तुशास्त्र (वास्तुयंत्रासकट), ’तुमचे यश तुमच्या हाती, मी यशस्वी होणारच’ छाप सेल्फ-हेल्प पुस्तके, योगचिकित्सा/ आयुर्वेद विषयक, धार्मिक/ पौराणिक, पाकशास्त्र आणि झटपट ___ शिका (इंग्रजी, शेअर बाजार, संगणक इ.) छाप पुस्तकांचे स्टॊल असे होते.


¶थोडी फार गर्दी भाषांतरीत/ रुपांतरीत पुस्तकांसाठी किंवा वादग्रस्त पुस्तकांसाठी होती.

तुरळक गर्दी ’नेहेमीचे यशस्वी लेखक/कवी’ (पुल, वपु, संदीप खरे इ.) यांच्या पुस्तकांभोवती होती.


¶मधे एके ठिकाणी एक सुंदर तरुणी सुंदर आवाजात ’पर्यावरण आणि प्रदूषण’ या विषयावर (किंवा तसेच काही तरी असेल) अतिशय चुकीची माहिती देऊन जनजाग्रुती करत होती, तरीही तिने काही लोकांना (त्यांच्या बायका तिथे येईपर्यंत...) चांगलेच ’खिळवून’ ठेवले होते!


¶बहुतेक लोक अमिताभच्या समारोप समारंभातल्या भाषणासाठी रेंगाळत (तेच तेच पान परत परत वाचत) उभे होते...अचानक लाऊडस्पीकरवर ’आता मी अमिताभ यांना त्यांचे मनोगत व्यक्त करायची विनण्ती करतो’...असे ऐकू आले...आणि फायर आलार्म वाजावा किंवा भूकंप व्हावा तसे सगळे ’रसिक वाचक’ हाततली पुस्तके टाकून अमिताभला बघायला आणि त्याचे (हिंदीमधले) मनोगत ऐकायला पळाले.

¶एकूणच स्वरूप फारच उत्सवी होते...वर्षातले ३ दिवस मिरवणाऱ्या आणि नंतर एकही पुस्तक न वाचणाऱ्या गर्दीबरोबर मी तिथे जाणे ही माझी चूक आहे का ’साहित्य रसिक’ आणि ’संमेलन’ यांच्याकडून काही वेगळे, भरीव घडण्याची अपेक्षा करणे ही माझी चूक तेच मला समजले नाही...तेवढ्यात मला मित्राचा फोन आला - ’अरे आयपीएल मधे मुंबई इंडियन जिंकणार! हरभजन तुफान मारतोय...’


¶करमणूकच करुन घेणे हाच एक हेतू असेल तर अमिताभच्या नाटकी, खोट्या बडबडीपेक्षा (’कसं काय पुणे’ म्हणून पुढे हिंदी भाषण, हिंदी कविता...मराठी साहित्य संमेलनात...आणि अध्यक्षांपासून सगळे माना डोलावणार) मला ’लाईव्ह ऎक्शन’ वाले टी-२० जास्त आवडते...म्हणून मी लगेच घरी परतलो!


¶हे झाले सो-कॊल्ड ’रसिक वाचक’ यांच्या बाबतीतले निरीक्षण...संयोजक/ लेखक आणि एकूणच ’संमेलन’ यां बद्दलचे मत पुढच्या भागात...लवकरच...¶



~ कौस्तुभ

Tuesday, March 16, 2010

वास्तुशास्त्र


सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे - तो त्यातल्या "शास्त्र" ह्या शब्दामुळे.

माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे...आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम लायकीपेक्षा जास्त (पैस, प्रसिद्धी, मान सन्मान इ.) हव्यास असलेली जनता त्याला खतपाणी घालते आहे.


काही दिवसांपूर्वी  "देव्हारा कुठे, कसा"  हा संजय पाटील यांचा (विनोदी) लेख मी वाचला तेव्हाच त्याबद्दल लिहायचे होते - ते काही कारणानी राहून गेले.  नंतर त्यांनी "टॊयलेटचा प्रश्न (भाग १ आणि २)" ह्या शीर्षकाचे अजून २ (विनोदी) लेख लिहीले (नशीब, देव्हाऱ्याच्या लेखासारखे ह्याचे नाव "संडास: कुठे, कसा" असे नाव नाही दिले!

अजून एक निरीक्षण म्हणजे अशा विषयात टॊयलेट हा शब्द जास्त बरा वाटतो, सतत ’संडास’ (हा शब्द) पचायला जास्त जड जाते आणि शौचकूप वगैरे वाचायला जड जाते. इंग्रजी ’टॊयलेट’ बरा!)


ह्याशिवाय पुण्यात जागोजागी ह्या वास्तुतज्ज्ञांचे होर्डिंग्स दिसू लागली अहेत. ’आबा, अप्पा, नाना’ इ. आदरणीय नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ’पक्या, पप्पु, बबडू, छोटू’ इ. तरूण आणि धडाडीचे कार्यकर्ते यांचे जे अंगावर येणारे प्रचंड फलक असतात - त्याच्या जोडीलाच हे फलक. ह्या फ्लेक्स बोर्ड ची खिल्ली उडवणारा एक फलक पहा:



अजून एक बदल म्हणजे पूर्वी नुसते वास्तु तज्ज्ञ असायचे आणि ते त्यांच्या ’अभ्यासाप्रमाणे’ घराची यथेच्छ तोडफोड करायला लावायचे. म्हणजे घराचे प्रवेशद्वार बरोबर नाही म्हणून असलेला मोठ्ठा दरवाजा बंद करुन ठेवायचा आणि उगाचच खिडकीच्या जागी एक बारीक भोक पाडून त्यातून ये-जा करायची (म्हणजे म्हणे वास्तुदेवता प्रसन्न होते आणि घरात आनंद, सुबत्ता येते!)


हल्लीचे ’व्यावसायिक’ जास्त चतुर आहेत - एक तर ते नुसते वास्तुतज्ज्ञ नसतात - वास्तुविशारद, वास्तु-शिरोमणि, वास्तुमहर्षि, वास्तुमार्तंड अशा पदव्या लावतात (नशीब अजून कोणी स्वतःला ’वास्तुपुरूष’ म्हणवत नाहीत, नाही तर लोक त्यांनाच घरात जिवंत पुरायचे!) आणि हे थोर लोक हल्ली घराची तोडफोड करायला सांगत नाहीत, त्याऐवजी काही (खर्चिक) ’उपाय’/ ’उपचार’ करून ते तीच सुबत्ता, तीच भरभराट मिळवून देऊ शकतात (अर्थातच खर्च तोडफोडी इतकाच होतो, पण मालकाला समाधान हे की आपण भिंती आणि खिडक्या पाडल्या नाहीत)


पुण्यात शास्त्री रोडवर एका वास्तुतज्ज्ञाचे एक होर्डिंग आहे त्याचा USP च मुळी ’विना तोडफोड तुमचे घर, ऒफीस, कारखाना वास्तुशास्त्रानुसार करा आणि सुख, संपत्ती आणि समाधान मिळवा’ असे आहे! त्यांनी ह्यापूर्वीच अशा ३००० हून अधीक संतुष्ट घरांना सुख, संपत्ती आणि समाधान दिले आहे म्हणे. शिवाय त्यांना स्व. राजीव गांधी यांच्या नावाने काही पुरस्कारही मिळाले आहेत. राजीव गांधी, ज्यांनी संगणक युग आणले (किंवा आणण्याचा प्रयत्न केला - ज्याप्रमाणे तुमचे राजकीय विचार असतील त्याप्रमाणे!) त्यांच्या नावाचा ”वास्तुशास्त्रा’साठीचा पुरस्कार हाच एक विनोद आहे.


असो. आता मी परत एकदा संजय पाटील यांच्या (विनोदी) लेखाकडे वळतो:

एक बेसिक न समजणारी गोष्ट म्हणजे, आपली संस्क्रुती ही इतकी थोर आहे की त्यात सगळ्या विषयांवर सगळे संशोधन आधीच झालेले आहे आणि सगळे संस्क्रुत श्लोकांमध्ये लिहूनही ठेवलेले आहे! त्यामुळे कुठल्याही चर्चेला, मुद्द्याला, आरोपाला आधार म्हणजे एखादा संस्क्रुत श्लोक!

मला सांगा - समजा पूर्वी संस्क्रुत हीच व्यवहारातील भाषा असेल तर त्या काळी होणारे कुठलेही लेखन (मग कितीही सामान्य लेखक असेल, किंवा कितीही बेजबाबदार विचार, लिखाण असेल) ते संस्क्रुतमध्येच होत असणार - पण ह्याचा अर्थ असा नाही की ते सगळेच अभ्यासपूर्ण आणि अनुकरणीय असेल. कदाचित त्या काळचे ’वास्तुतज्ज्ञ’ छाप लेखक/कवी असतील - जे तितकेच सुमार आणि अर्थहीन (परंतु संस्क्रुत मध्ये) लिहायचे...


पण संजय पाटील आणि तत्सम स्वघोषित तज्ज्ञ (फक्त ह्याच क्षेत्रातले नाही, तर इतर अनेक विषयातले ज्यात संस्कुत श्लोक आणि ग्रंथ हा त्यांचा आधार असतो) अशा फुटकळ संस्क्रुत श्लोकांचा आधार घेतात आणि त्यांना सोयिस्कर अर्थ काढून ’विकतात’.

आता त्यांच्या लेखातील ही वाक्ये पहा - लेखातली वाक्ये ठळक अक्षरात दिली आहेत, पाहिजे तर तुम्ही मूळ लेख वाचु शकता - माझे विचार साध्या अक्षरात दिले आहेत.

"...देव्हारा आयताक्रुती असावा, असं माझं मत आहे. (नीट लक्षात घ्या - हे त्यांचे वैयक्तीक मत आहे!) त्यासाठी एका श्लोकाचा संदर्भ देतो (म्हणजे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे संस्क्रुत श्लोकाची ’कुबडी’ वापरली)

"समश्रं समव्रुत्तं यत्पुरुष चेति कथ्यते

आयाताकारधिष्ण्यं वा वनितेति प्रकीर्तितम"

(मानसारम - म्हणजे कुठले काय ते नाही लिहीले)

अर्थात: इमारत जर चौरसाक्रुती अथवा गोलाकार असेल तर ती पुल्लिंगी समजावी आणि आयताक्रुती स्त्रीलिंगी समजावी. पुल्लिंगी इमारतीत स्त्रीलिंगी मूर्ती ठेवू नये मात्र स्त्रीलिंगी इमारतीत स्त्री अथवा पुल्लिंगी मूर्ती ठेवता येते.

इमारतीसाठी असलेला हा नियम घटबिंब प्रतिबिंब द्रुष्टांतानुसार देव्हाऱ्यालाही लागू होतो. (कशावरून? हा सोयिस्कर अर्थ कसा काढला? ह्यात कसले ’शास्त्र’? पण पुढचा विनोदी भाग वाचा, त्यात लगेचच ह्या शंकेचं उत्तर मिळेल)

"...या आयताचं लांबी रूंदीचं प्रमाण १:१:६ असं असावं. आता तुमच्या मनात प्रश्न तयार होईल की हे प्रपोर्शन कसे काय काढलं? हे माझं संशोधन (?) आहे. याला काही गणिती सिद्धांताचा आधार अहे. मी त्याला सच्रेद गेओमेत्र्य (?) असं म्हणतो. आर्किटेक्टस आणि सिव्हिल ईंजिनीअर्सना ते चटकन समजेल. पण बाकीच्यांना ते समजणं कदाचित थोडसं अवघड असल्यानं सध्या त्याबद्दल लिहीत नाही. भविष्यात केव्हातरी लिहीन. "

(मला समजत नाही, हे सोयिस्कर पणे पाहिजे तेव्हा संस्क्रुत श्लोक आणि पाहिजे तेव्हा सायन्स/ ईंजिनिअरिंग याचा आधार कसा घेतात?)

"...देव्हारा मुख्य दरवाज्यासमोर असेल तर द्वारवेध (??) होतो (म्हणजे काय बुवा?) देवाची नजर थेट दरवाज्यावर येणं चांगलं नाही. शिवाय दरवाजात उभं राहिल्यानंतर - वाकून बघितल्यावर नव्हे - देव्हारा दिसणं हा प्रकार वास्तुशास्त्रानं निषिद्ध सांगितलाय"

(कोणते वास्तुशास्त्र??? कोणी लिहीले, आणि अचानक कसे प्रचलित झाले???)"


अशी अनेक उदाहरणे ह्या लेखात आहेत.लोकमान्य टिळकांनी गीतेचा अभ्यास करून ’गीता-रहस्य’ हा ग्रंथ लिहीला. इतरही अनेकांनी प्राचीन भारतीय संस्क्रुतीबद्दल खूप अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. पण त्या अनेक थोर आणि विद्वान व्यक्तींनी कधी ’वास्तुशास्त्र’ किंवा तत्सम विषयावर लिहिल्याचे ऐकीवात नाही. कदाचित ते ग्रंथ त्याकाळी उपलब्ध नसतील आणि अचानकच हल्लीच्या वास्तु-पुरुषांना (लॊटरी लागल्यासारखे!) ते मिळाले असतील.


मला राग ह्याचा आहे की चांगले सुशिक्षेत लोक ही ह्या वाटेला लागतात.

माझा एक मित्र वास्तुशास्त्रानी झपाटला आहे. घरातल्या खोल्या पंचकोनी करण्यापासून ते अनेक लोलक, लंबक, यंत्र टांगून घराचे जंतर-मंतर करण्यापर्यंत सगळे उपाय (विना-तोडफोड किंवा तोडफोडीसहीत!) केल्यावरही त्याला ’अपेक्षित’ सुख मिळेना (म्हणजे महिना ’फक्त’ ८०,००० पगाराच्य ऐवजी त्याला १,२०,००० रु. पगार पाहिजे होता.)

एका नवीन वास्तु-पुरुषाकडे तो गेला. त्यांनी त्याचा हात नीट पाहिला, आणि घरही पाहिले. त्याच्या बोटात नवीन रत्न, अंगठी घालायला एकही जागा रिकामी नाही, तसेच भिंतीवरचा कोणताही कोपरा काहिही टांगायला शिल्लक नाही हे त्या चतुर वास्तु-पुरुषानी ओळखले. त्यामुळे ह्याला काय ’उपाय’ सुचवावा हे त्याला कळले नसेल कदाचित. त्यामुळे त्याने नुसतेच ’निदान’ केले, ’उपाय’ नंतर सांगतो म्हणाला - त्याचे निदान होते, तुमचे शौचालय चुकीच्या ठिकाणी आहे. वास्तुशास्त्रानुसार ते घराच्या मुख्य दरवाज्यापाशी असायला हवे!


आता माझा मित्र घाबरला होता. मला भेटला तेव्हा त्यानी हे सगळे सांगितले. मी गंमतीनी त्याला म्हणालो, "अरे काही तरी सोप्पा उपाय असेलच ना. नाही तर तू असं कर, एक बेडपॆन घे आणि ते तुझ्या मुख्य दरवाज्याच्यावर टांगून ठेव, किंवा फरशी खाली पुरून ठेव - म्हणजे झाले!"

"अरे खरच! हे जमू शकेल, थांब लगेच य़ ना फोन करुन विचारतो!" ही कमाल झाली, म्हणजे मी त्याची टिंगल करायच्या हेतूने बोललो ते पण त्यानी सिरिअसली घेतले!

परत काही दिवसांनी त्याचा फोन आला, की मी सुचवलेला उपाय त्यानी त्या वास्तु-पुरुषाला सांगितला आणि त्याला म्हणे तो ’in-principle’ आवडला.

त्यात थोडे बदल करुन (आणि काही संस्क्रुत श्लोकांचा आधार घेऊन!) तो बाबा आता उपाय सुचवणार आहे!


मी कपाळावर हात मारून घेतला. तेव्हापासून मी अजून त्या मित्राच्या घरी जायचे धाडस केले नाहीये! न जाणो दार उघडताच संडास किंवा संडासाच्या आकाराची खूर्ची समोर ठेवलेली असायची!


~ कौस्तुभ

Saturday, February 13, 2010

नवीन डोमेन आणि गेस्ट ब्लॊग


नवीन डोमेन सेट अप केल्यावरचा हा माझा पहिलाच  ब्लॊग पोस्ट. अजून बऱ्याच लोकांना हा नवीन ब्लॊग माहितीच नाहिये (जणू काही जुन्या ब्लॊगला हजारो लोक भेट द्यायचे...असो)

तर आता मी माझे मराठी आणि इंग्लिश ब्लॊग एकत्र केले आहेत. त्याच बरोबर एक ’गेस्ट ब्लॊग’ सुरु केला आहे. त्याबद्दलच मला थोडे लिहायचे आहे.

माझ्या माहितीतले बरेच जण असे आहेत जे बऱ्यापैकी ते अतिशय उत्तम लिहू शकतात - आणि त्यांच्या आवडीनिवडीही विविध आहेत...मला त्यांच्याशी चॆट करताना असे जाणवते.

पण काही ना काही कारणांमुळे त्यांचा ब्लॊग नाहीये...म्हणजे कुणाला आळस, तर कुणी टेक्नॊलॊजीचा प्रॊब्लेम, कुणाला वाटते नियमित लिहीता यायचे नाही आणि एखाद दुसऱ्यांदाच लिहायचे तर त्यासाठी इतका खटाटोप कशाला? कुणी डायरी लिहितात म्हणून ब्लॊग लिहीत नाहीत...असे काहीतरी.


जर लिहिताच येत नसेल किंवा लिहायचेच नसेल तर गोष्ट वेगळी...पण जर आळस किंवा Lack of motivation हा प्रॊब्लेम असेल तर त्यावर उपाय शक्य आहे असे मला वाटते. मध्यंतरी पुण्यात एक मराठी ब्लॊगर्स मीट झाली. मी त्याला गेलो होतो. तिथे मी हा विचार मांडला होता. की त्यांना लिहायला उद्युक्त करायचे तर  आपण ते पब्लिश करण्याचे काम करायचे...म्हणजे त्यांना फक्त लिहीता येईल. तसेच असे अनेक एक-वेळ लेखक बघून हळूहळू ते नियमित लिऊ लागतील. असे मला वाटते...खरंच तसे होईल का ते माहिती नाही पण म्हणूनच एक प्रयत्न म्हणून मी एक ’गेस्ट ब्लॊग’ सेट अप केला आहे.

तरी तुम्हाला कुठल्याही विषयावर कोणत्याही भाषेत काही लिहून प्रसिद्ध करायचे असेल तर मला कळवा. तुमचे स्वागतच आहे!

सध्या मीच काही लोकांच्या मागे लागून लागून त्यांना काही तरी लिहा’ असे सांगून त्यांचा छळ करतो आहे :)

त्यातले काही जण (माझी कटकट बंद व्हावी म्हणून बहुतेक!) हो म्हणाले आहेत...ते खरच लिहीतील ह्या आशेवर मी आहे! :)


असो...प्रयत्न करणे माझ्या हातात आहे...फळाची अपेक्षा मी करत नाही (विशेषतः फ्रूट सॆलड खाताना!!!)

~ कौस्तुभ

Tuesday, February 2, 2010

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखत

अर्थतज्ञ अनिल बोकील यांची ई-टीव्ही संवाद वरील मुलाखत

त्यांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत अनेक क्लीष्ट गोष्टी छान समजावून सांगितले आहे!






~ कौस्तुभ

Saturday, December 12, 2009

लाचारी…

लाचारी...

शरद पवारांचा आज जन्मदिन...त्यानिमित्तानी  पेपरमध्ये आलेल्या पान-पान भर जाहीराती पाहून मला काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या वेळचा एक प्रसंग आठवला...

एक कट्टर शिवसैनिक (तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला) एका न्यूज चॆनेल वर... ’हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे...’ वगैरे वगैरे बोलत होता...म्हणजे त्या चॆनेल वर त्या सूत्रधारानी ’तुमचे मत थोडक्यात मांडा...तुम्हाला मी २ मिनिटांचा वेळ देतो आहे’ असे म्हटल्यावर त्या २ मिनिटांपैकी १ मिनिट सगळ्या पदव्या, उपाध्या आणि नमस्कार चमत्कार आणि आदर मानसन्मान यांच्या विशेषणांमध्ये खर्च केला आणि उरलेल्य १ मिनिटात त्याचा ’मुद्दा’ उरकला...त्याचे ही बरोबरच होते म्हणा...कारण बाकी काही बोलला नाही तरी चालेल, पण आपल्या आदरणीय नेत्याचे एक्जरी विशेषण त्याने वगळले असते तर त्याला त्याची ’मातोश्री’ आठवायची पाळी आली असती!

हा प्रसंग लोकसभा निवडणूकीच्या काळातला...पण नंतर विधानसभा निवडणूका आल्या (ज्यात हा एक ’ईच्छुक उमेदवार’ होता)...आणि ह्यानी त्याची निष्ठा बदलली आणि शरद पवारांच्या पक्षात उडी मारली...नंतर लगेचच तो त्याच चॆनेलवर त्याच कार्यक्रमात तावातावानी भांडताना दिसू लागला...फक्त राष्ट्रवादीच्या बाजूनी. तेव्हा एकदा परत ’२ मिनिटात’ आपला मुद्दा मांडताना त्याची सुरुवात होती ’आमचे आदरणीय नेते क्रुषीमंत्री ना. शरदचंद्रराव जी पवारसाहेब...’ !!!

'शरद पवार' यांचे एकदम 'शरदचंद्रराव जी पवारसाहेब'

अरेरे किती ही लाचारी...

ह्याच लाचारीला राजकारणाच्या संदर्भात ’निष्ठा’ म्हणतात...तर अध्यात्माच्या क्षेत्रात त्याचे भाषांतर ’ह.भ.प. प. पू. सदगुरू (किंवा जगतगुरू!) श्री श्री अमूक तमूक महाराज’ वगैरे होते आणि त्याला ’भक्ती’ म्हणतात.

आम्ही (म्हणजे ’स्वतः’!) त्याला लाचारी म्हणतो.

~ कौस्तुभ

Tuesday, October 13, 2009

ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे



ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.



आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते फक्त विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादीत असते...बाकीच्या लोकांना त्याच्याशी फारसे घेणेदेणे नसते.



परवाच आमच्या ओळखिची एक बाई तिच्या दंगा करणाऱ्या ८-९ वर्षाच्या मुलाला समजावून सांगत होती: ’असा दंगा नाही करायचा बाळा, शांत बसलं ना की लोकं शाबासकी देतात, बक्षीस देतात...तो ओबामा बघ...शांत बसल्याबद्दल त्याला केवढा मोठ्ठा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला...मग, बसणार ना शांत आता?’



’बाळा’ नी पूर्ण दुर्लक्ष करून त्याला जे करायचे होते तेच ह्केले...पण मला शांत बसण्याबद्दल हे असे ’incentive’ पाहून गंमत वाटली...



पण कुणी सांगावे, त्या नोबेल कमिटी सुद्धा कदाचित असाच विचार केला असेल...म्हणजे आधीच्या जॊर्ज बुश पेक्षा ओबामा "बराच शांत" आहे...अध्यक्ष होऊन ८-१० महीने झाले तरी अजून एकही नवीन युद्ध सुरु केले नाही...आणि तसे काही करायच्या आतच त्याला नोबेल देऊन टाका...म्हणजे एक जबाबदारी म्हणून तरी तो असे काही करणार नाही!



अन्यथा, ओबामानी असे अजून काहीच केले नाहीये ज्यामुळे त्याचा नोबेल साठी नुसता विचार सुद्धा केला जाऊ शकतो. एक तर नोबेल ला नामांकन द्यायची मुदत ही तो अध्यक्ष झाल्यानंतर केवळ २ महिन्यांनी होती, म्हणजे आत्ताइतके ८-१० महिनेही नाही...केवळ २ महीने. त्यामुळे त्याला नोबेल देणे ह्यात राजकीय विचारच जास्त आहे असे वाटते.



पण आपल्याकडच्या मिडियानी ह्याची दखल घेऊन चर्चा करावी याचे मात्र मला फार आश्चर्य वाटले. नुकतेच मी ’भारतरत्न’ पुरस्कारांवरचे एक चांगले आणि माहितीपूर्ण पुस्तक वाचले. भारतरत्न पुरस्कारातही अनेक वादग्रस्त विजेते आहेत हे बऱ्याच लोकांना माहितीच नसते. आणि आपल्याकडचे विचारवंत, व्रुत्तपत्रे ई. त्यावर कधी बोलताना, टीका करतानाही दिसत नाहीत.



कदाचित ओबामावर टीका करणे सोप्पे असेल कारण त्याचा ह्या टीकाकारांना काही त्रास होणार नाही, आणि ओबामाला तर नाहीच नाहे! पण तेच इथल्या राजकीय पक्षांवर, नेत्यांवर टीका करणे म्हणजे उगाच आपला ’पोटापाण्याचा’ धंदा बंद पडायचा...असा सोप्पा विचार ही मंडळी करत असणार. त्यामुळे कोणी त्या विषयावर जास्त बोलायला धजावत नसेल.



राजीव गांधी, एम. जी. रामचंद्रन या आणि अशा लोकांना जेव्हा भारतरत्न दिले गेले तेव्हा त्याबद्दल चर्चा, वाद व्हायला पाहिजे होते...असे का केले याचे स्पष्टीकरण सरकारला द्यायला भाग पाडायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही. राजीव गांधी यांना तर ’भारतरत्न’ का दिले हे मला अजून समजलेले नाही. १९८० साली ते (अनिच्छेनीच) राजकारणात आले...१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येबद्दलच्या सहानुभूतीमुळे पंतप्रधान बनले...लगेच १९८५ साली त्याच सहानुभूतीचा फायदा घेऊन विक्रमी संख्येनी त्यांच

Monday, September 28, 2009

समर्थ रामदास स्वामीं विषयी थोडेसे (बऱ्याच विषयांतरासकट)



नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते...अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.

तसा मी ’रामदासी’ नाही...म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही...त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो...

रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे श्लोक’ स्पर्धेतले होते. ज्याबद्दल मला ’रंगीत खडूची पेटी’ बक्षीस मिळाली होती...(ज्यातले रंग ’ढ’ दर्जाचे होते...आमच्या चित्रांसारखे)


पहिले बक्षीस, विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, ’पाकशास्त्रात’ होते! होय, पाकशास्त्र स्पर्धेत मी ’दडपे पोहे’ बनवायला मदत केली होती...म्हणजे सगळे काम आमच्या ’बाईं’नी च केले होते (हल्ली ह्यांना’टीचर’ म्हणतात म्हणे) मी फक्त त्यात ’रस’ दाखवला - बाकीच्या मुला-मुलींपेक्षा - म्हणून मला बक्षीस मिळाले. अर्थात माझा ’रस’ हा त्यानिमित्तानी पोह्यांची ’चव’ बघायला मिळेल ह्यात जास्त होता...असो. तर हे पहिले बक्षीस म्हणून मला कपडे लावायचा ’हँगर’ मिळाला होता...


म्हणजे स्पर्धा प्रकार, मुलांचे वय, ईयत्ता तुकडी, त्यामागचा ’प्रोत्साहन’ द्यायचा हेतू ह्या सगळ्या-सगळ्याशी संपूर्ण विसंगत असे बक्षीस देण्यात आमची शाळा तरबेज होती...मनाच्या श्लोकाला ’खडूची पेटी’, पाककलेला ’हँगर’, चमचा लिंबूला छोटी स्टीलची वाटी/ वाडगा, तीन पायाच्या शर्यतीला ३ ’भेट द्यायची पाकिटे’ (प्रत्येक पायाला एक ह्या हिशोबानी...पण तीन पायाच्या शर्यतीत दोनच जण भाग घेतात, हे मात्र त्यांच्या लक्षात यायचे नाही)

ही अशी काही तरी बक्षीसे द्यायचे आमची शाळा...म्हणजे त्यानी प्रोत्साहन मिळणे तर दूरच राहो, उलट हसंच जास्त व्हायचे. माझी तर ’हँगर’ ह्या बक्षीसावरून खूपच चेष्टा झाली होती...कारण माझा ’तोळा-मासा’ बांधा बघून (हल्ली असा बांधा बघायला मिळत नाही...हल्ली सगळेच ’अति-सुपोषित’ असतात...) मल ’हँगर’ असे चिडवायचे...जणू काही हँगरला शर्ट अडकवालाय असे वाटायचे म्हणून...आणि त्यात परत हँगरच बक्षीस....असो. पण अशा टीका, टक्के-टोणपे सहन करतच थोर लोकं (उदा: ’स्वतः’) मोठी होतात...मी ’मोठा’ दुसऱ्याच अर्थानी झालो...माझे आत्तचे ’बाळसेदार’ रूप बघता ’हाच का तो हँगर’ असा प्रश्न पडेल...पण कसे का असेना...मीही मोठ्ठा झालो!

असो...हे थोडे (जास्तच) विषयांतर झाले. तर सांगायचा मुद्दा हा की...लहानपणी मनाचे श्लोक किंवा ईतर श्लोक, ओवी, अभंग असे वाचनात यायचे. त्यावरुन बऱ्याच गंमतीजंमती पण व्हायच्या...

म्हणजे - जे का रंजले गांजले च्या ऐवजी ’जे कारंजे गंजले’ असे काही तरी...एकदा संत चोखा मेळा यांच्या ’चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा’ ही ओळ एकाने चुकून गडबडीत ’चोखा म्हणे माझा भाव कमी आहे’ अशी वाचली...आणि मग मास्तर असा हात सैल करायचा ’मणिकांचन योग’ कसा सोडतील...
आमच्या शाळेतले शिक्षक पण ’प्रीपेड’ शिक्षा करायचे...सगळ्यांना नाही...काही निवडक मान्यवरांना, आणि अर्थातच माझा नंबर त्यात फार वरचा होता! म्हणजे शिक्षक वर्गात आले की काही कारण नसताना आम्ही काही मुले दंगा करणारच असे ग्रुहीत धरून ५-५ छड्या मारयचे आणि मग हजेरी घ्यायचे...आमची ’हजेरी’ आधीच झालेली असायची...मग आम्हीसुद्धा मार तर आधीच खाल्ला आहे मग आता दंगा का करु नये? असा विचार करुन खाल्लेल्ल्या माराची भरपाई म्हणून दंगा करायचो. ’कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर मोबदला मिळाय


Saturday, September 5, 2009

देश माझा, मी देशाचा





नुतकेच मी लालक्रुष्ण अडवाणी यांचे ’देश माझा, मी देशाचा’ हे आत्मचरित्र वाचले. खूप दिवसांनी एक चांगले राजकीय आत्मचरित्र वाचायला मिळाले. तसा मी संघ किंवा भाजप च्या विचारसरणीशी सहमत नाही...किंबहुना विरोधातच आहे. पण तरिही अडवाणी मला नेते म्हणून आवडतात. २००९ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या पुण्यातल्या प्रचारसभेलाही मी गेलो होतो - भाजपला मत देणार नाही ह्याची खात्री असूनही :)

ह्या आत्मचरित्राचा मी मराठी अनुवाद वाचला...त्यामुळे तो मूळ पुस्तका ईतका चांगला आणि नेमका आहे की नाही हे सांगता येत नाही, पण काही ठिकाणी ईंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना आशय किंवा लेखन शैलीतील गंमत/ मूळ उद्देश हरवला आहे की काय असा संशय येतो...पण असे किरकोळ प्रमाणात घडले आहे

एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे - जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांचा उल्लेख (चांगल्या बाबतीत) अनेकदा आला आहे...विशेषतः महात्मा गांधी यांचा, त्यांच्या विचारांचा... भाजपा आणि जनसंघाच्या अनेक नेत्यांपेक्षा खूप जास्त प्रमाणात.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे (खरं तर माझ्यासाठी आश्चर्यकारक!) अडवाणींचे वाचन चौफेर आहे, नुसते वाचनच नाही तर विचार ही...विरुद्ध मतप्रवाहाबद्दल नुसताच आकस बाळगणे आणि ते समजावून न घेताच टीका करणे ही रा. स्व. सं किंवा भाजप बद्दलची समजूत निदान अडवाणींना तरी लागू होत नाही...त्याचबरोबर त्यांचे जीना यांच्याबद्दलचे ’मवाळ’ विचार/ वक्तव्य हे राजकीय डावपेचाचा भाग नसून खरच प्रामाणीक मत असावे असेही वाटते.

आणि त्याचेच एक निदर्शक म्हणजे त्यांनी पुस्तकात खलील जिब्रान, चीनी तत्ववेत्ता कन्फ्युशियस, बर्ट्रांड रसेल आणि साहीर लुधियानवी पासून स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु, महर्षी अरविंद योगी आणि महात्मा गांधींपर्यंत अनेकांचे विचार, वचने आणी ओळी जागोजागी वापरल्या आहेत.

उदा: खालील महात्मा गांधींच्या काही ओळी ह्या एका प्रकरणाची सुरुवात म्हणून वापरल्या आहेत.

==================================================
सात सामाजिक पापे

१. तत्वशून्य राजकारण
२. नैतिकतेशिवाय व्यापार
३. कामाशिवाय मिळालेली संपत्ती
४. चारित्र्यहीन शिक्षण
५. मानवताविरहित शिक्षण
६. अविवेकी उपभोग
७. त्यागाशिवाय भक्ती

~ महात्मा गांधी

(एल के अडवाणी यांच्या ’देश माझा मी देशाचा’ ह्या आत्मचरित्रातून, पान क्र. ४८०)
==================================================

त्याप्रमाणेच एके ठिकाणी वापरलेले संस्क्रुत वचन अडवाणींची प्रतिमा आणि त्यांचे विचार ह्याविषयीही बरेच काही सांगून जाते

॥ एकं सत विप्रः वसुधा वदन्ति ॥

अर्थात - सत्य एकमेव असते, जाणकार त्याचे वेगवेगळे विश्लेषण करतात...
(पान क्र. - ८४३)


~ कौस्तुभ

Sunday, May 3, 2009

’शब्दबंबाळ’ मराठी भाषा आणि सावरकर

परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)... त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र - आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित विद्वानांचा कल असतो आणि त्यामुळेच मराठी भाषा व्यवहारात मागे पडते आहे - ह्या मुख्य संकल्पनेवर हा लेख आहे.



त्यात दिलेली काही सरकारी भाषेचे (खरं तर ’शासकीय परिभाषा’ असे म्हटले पाहिजे!) ’नमुने’ खरच गमतीदार आहेत. उदा. वनवासी लोकांचे हक्क आणि पुनर्वसन ह्याबद्दलचे हे सरकारी उपकलम पहा:




"बाधिक व्यक्ती व समूह यांच्याकरिता सुरक्षित उपजीविका पुरवण्यासाठी आणि प्रस्तुत विधि व केंद्र सरकारच्या धोरणात दिलेल्या , अशा बाधित व्यक्ती व समूह यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी पुनःस्थापना करणे किंवा पर्यायी योजना तयार करणे व संसूचित करणे. प्रस्तावित पुनःस्थापनेसाठी व योजना लेखी स्वरूपात मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील गामसभेची संमती मोफत मिळवणे..." इत्यादी इत्यादी.



मराठी ही माझी मातृभाषा असल्याचा माझा अभिमान हे ’शासकीय मराठी’ वाचून गळून पडला :(



४-४ वेळा त्याच ओळी वाचूनही मला त्याचा अर्थ समजला नाही. असे ’शब्दबंबाळ’ मराठी हे लोक का लिहितात आणि त्यातून काय सिद्ध करायचा त्यांचा प्रयत्न असतो काय माहित?



ते वाचून मला ’मुघल-ए-आझम’ ह्या चित्रपटाची आणि त्यातल्या ’शब्दबंबाळ’ उर्दूची आठवण झाली. नुकताच २-३ वर्षांपूर्वी हा चित्रपट रंगीत स्वरुपात परत प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या एका मित्रा बरोबर सीडी वर परत पाहिला. हसून हसून पुरेवाट झाली आमची. डायलॊग तर रिवाईंड कर-करुन ऐकले!



"’शहेजादे-ए-आलम’ का पैगाम ’आवाज-ए-बुलंद’ पढा जाए" असे झिल्ले-ए-इलाही शहेनशाह-ए-आलम महाबली मोहम्मद जलालुद्दिन अकबर म्हणतो (खरं तर किंचाळतो)...म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ..."सलीम चे पत्र वाच" बस्स, ईतकेच!



त्यात शेवटी एके ठिकाणी सलीम (म्हणजे आपला तेलकट-तूपट चेहेऱ्याचा आणि जास्त तळलेल्या साबुदाणा वड्यासारखा दिसणारा दिलीप कुमार) म्हणतो: "मै अभी अभी शहेनशाह की आखोंमे शोले देख के आ रहा हू" ...त्यावर माझ्या मित्राने त्याचे सामान्यज्ञान पाजळले... "हा चित्रपट रंगीत बनवला ना तेव्हा ही लाईन टाकली बंरं का’... मी: "कशावरून?"  ....तो: "अरे म्हणजे काय...’मुघल-ए-आझम’ १९६० चा...शोले १९७५ चा...मग सलीम तो आधीच कसा पहाणार? आत्ता रंगीत केला तेव्हा शोले येऊन गेला होता..."



बाकी त्यातली सगळीच पात्र विनोदी आहेत. पृथ्विराज कपूर हा त्याचा ’center of gravity’ त्याच्या पोटात असल्यासारखा सतत हलत-डुलत असतो... आणि सुप्रसिद्ध व्हीलन अजीत हा त्यात सलीमचा मित्र आणि एक राजपूत राजा झाला आहे...मला सारखे मध्येच एकदा तरी तो ’रॊबर्ट, व्हेरी स्मार्ट!’ असे म्हणेल अ

Wednesday, July 26, 2006

Two Monks

"Two monks were traveling together when they came across a river crossing. There on the bank, they saw a beautiful woman, finely dressed, who wished to cross the river but was unable to do so. Without a word, the older monk simply picked up the woman and carried her to the other side.

The young monk, seemingly agitated for the rest of their journey, could not contain himself. Once they reached their destination after a couple of days, he exploded at the older monk. "How could you, a monk, even consider carrying a woman in your arms, much less a young and beautiful one? It is against our teachings. It is very dangerous."

"I put her down two days ago," said the older monk. "Why are you still carrying her?"

Food for thought


Nothing is enough for a person for whom enough is too little